स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना
वडगाव -निळा रेल्वे स्थानकावरील विलंबाचा प्रश्न निकाली; गाड्यांचा थांबा आता फक्त ५–१० मिनिटांवर
परळी वैजनाथ | प्रतिनिधी
परळी-वडगाव रेल्वे स्थानकावर गाड्या विनाकारण दोन-दोन तास थांबत असल्याच्या समस्येला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. या गंभीर मुद्द्यावर स्थानिक वृत्तपत्रांनी सातत्याने आवाज उठवल्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने दखल घेत कारवाई केली असून, आता गाड्यांचा थांबा केवळ ५ ते १० मिनिटांवर आला आहे.
काही दिवसांपूर्वी या स्थानकावर रेल्वे गाड्या अनावश्यकपणे दीर्घकाळ थांबविल्या जात असल्याचे प्रकार समोर आले होते. प्रवाशांना यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांनी ठळकपणे बातम्या प्रसिद्ध करत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले.
या बातम्यांची गंभीर दखल घेत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. तांत्रिक बाबींची तपासणी करून विलंबामागील कारणांचा शोध घेतल्यानंतर तातडीने आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. परिणामी, गाड्यांचा अनावश्यक थांबा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
याशिवाय, स्थानकावर सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस चौकीची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध झाले असून गाड्या आता नियोजित वेळेनुसार ५ ते १० मिनिटांच्या अधिकृत थांब्यानंतर पुढील प्रवासासाठी रवाना होत आहेत.या बदलामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ वाचणार असून त्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होणार आहे.
दरम्यान, हा लोकहिताचा प्रश्न सातत्याने लावून धरल्याबद्दल आणि प्रशासनाला जागृत केल्याबद्दल रेल्वे प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांनी पत्रकार आणि संपादकांचे आभार मानले आहेत. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातूनच ही समस्या मार्गी लागल्याचे मत व्यक्त होत आहे.

उखळी बु.येथील रेल्वे फाटक हे दिवसभरात वारंवार रेल्वे येण्याच्या अगोदर किमान २५-३०मिनिटे बंद करण्यात येते त्यामुळे संबंधित रस्त्यांवरुन ये-जा करणार्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत आपल्यास स्तरावरून प्रवाशांना न्याय मिळवून द्यावा
उत्तर द्याहटवा