प्रभावी अंमलबजावणीसाठी पर्यावरण व पशुसंवर्धन सचिवांना दिले निर्देश
डॉ.नयनकुमार आचार्य यांना राष्ट्रीय वैदिक विद्वत् पुरस्कार
परळी वैजनाथ दि.३०-
वेद व संस्कृत साहित्याचे अभ्यासक प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य यांना मुंबई येथील 'आर्य समाज' या सामाजिक कार्यातील अग्रणी संस्थेच्या वतीने नुकताच प्रतिष्ठेचा मानला जाणारा "राष्ट्रीय वैदिक विद्वत् पुरस्कार" प्रदान करण्यात आला.
मुंबई आर्य समाजाचे अध्यक्ष श्री हरीश आर्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यास मुंबई प्रदेश भाजपच्या प्रवक्त्या सुमिता सुमन सिंह, प्रसिद्ध उद्योगपती विपिनभाई पटेल, अरुण अब्रोल, विजय गौतम, देशबंधू शर्मा इत्यादी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते डॉ. श्री नयनकुमार आचार्य यांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, गौरव राशी, शाल, श्रीफळ व मौक्तिकमाला प्रदान करून या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे थोर समाजसुधारक महर्षी दयानंद सरस्वती यांनी १८७५ साली सर्वात प्रथम याच आर्य समाजाची स्थापना केली होती. गेल्याच वर्षी या संस्थेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव मोठ्या स्वरूपात साजरा झाला होता. वैदिक ज्ञानाच्या प्रचार व प्रसार कार्यात योगदान देणाऱ्या एका विचारवंतास या संस्थेच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. यावर्षी डॉ. श्री नयनकुमार आचार्य या पुरस्काराचे मानकरी ठरले.
श्री आचार्य यांनी आजपर्यंत वैदिक विषयांवर विविध मासिक व दैनिक वृत्तपत्रांतून विपुल प्रमाणात लेखन केले असून दहा ग्रंथांची निर्मिती व संपादन केले आहे. परभणी व बीड आकाशवाणीवरून त्यांचे आजपर्यंत ४५० चिंतनपर विचारप्रबोधन कार्यक्रम झाले असून शाळा - महाविद्यालये व जाहीर कार्यक्रमातून २०० पेक्षाही अधिक व्याख्याने दिली आहेत. श्री आचार्य हे वेदांतील विशुद्ध मानवी मूल्यांच्या प्रसारासाठी ते प्रयत्नशील असून परळी येथील वैद्यनाथ महाविद्यालयात गेल्या वर्षांपासून संस्कृत विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य करतात.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जवाहर शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. सदाशिवराव मुंडे , सचिव श्री दत्ताप्पा इटके, श्री जुगलकिशोर लोहिया यांच्यासह सर्व पदाधिकारी, वैद्यनाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. व्ही. जगतकर, उपप्राचार्य डी. के. आंधळे, डॉ.व्हि.बी.गायकवाड, प्रा. डॉ.पी.एल.कराड, प्रा. हरीश मुंडे व प्राध्यापकांनी श्री आचार्य यांचे अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा