५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन
चला, आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध करुया.. हे सर्वांसाठीच आवश्यक आहे!
प्रशासनाचे धाडसी पाऊल:परळी वैजनाथ नगरपरिषद राबवणार अतिक्रमण हटाव विशेष मोहीम
५ एप्रिलपर्यंत स्वयंस्फूर्तीने अतिक्रमण काढण्याचे नागरिकांना आवाहन
परळी वैजनाथ : प्रतिनिधी...
गेल्या अनेक वर्षांपासून परळी शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर अतिक्रमणं मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत. अतिशय सुटसुटीत व वाहतूकीला विना अडथळा असे समर्पक रुंद रस्ते असतांनाही वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त रचना आणि बेशिस्त पार्किंग यामुळे सर्वांनाच प्रचंड त्रासातून जावे लागत आहे. त्यामुळे आपणच आपले शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध करुया ,हे सर्वांसाठीच आवश्यक आहे हा तमाम परळीकर नागरिकांचा मनापासून निर्धार आहे.आता यासाठी नगर परिषद प्रशासनानेही धाडसी पाऊल टाकत परळी वैजनाथ नगरपरिषद अतिक्रमण हटाव विशेष मोहीम राबवणार असल्याची सूचना काढली आहे.
परळी शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने अतिक्रमण हटावाची विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील मुख्य रस्ते, फूटपाथ, नाले तसेच इतर सार्वजनिक ठिकाणांवर झालेले अतिक्रमण हटवून शहर सुटसुटीत आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. नगरपरिषदे कडून जाहीर करण्यात आलेल्या सूचनेनुसार, शहरातील सर्व नागरिक, व्यावसायिक व दुकानदारांनी रविवार, दिनांक ५ एप्रिलपर्यंत आपापले अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढून घ्यावे, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. ही मुदत अंतिम असल्याचेही प्रशासनाने ठामपणे सांगितले असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या मोहिमेअंतर्गत रस्त्यांवर अडथळा ठरणारी दुकाने, फेरीवाले, बांधकाम साहित्य, फूटपाथवरील अतिक्रमणे तसेच नाल्यांवर केलेले बेकायदेशीर बांधकाम यांच्यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अतिक्रमणामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होऊन अपघातांचा धोका वाढत असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.दरम्यान, दिलेल्या मुदतीनंतरही अतिक्रमण कायम ठेवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता नगरपरिषदेचे पथक थेट अतिक्रमण हटविण्याची कारवाई करणार असून, संबंधितांचे साहित्य जप्त करण्यात येईल. तसेच अतिक्रमण हटविण्याचा खर्च आणि दंडाची रक्कम संबंधितांकडून वसूल केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईदेखील करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहर स्वच्छ, सुंदर आणि वाहतूक कोंडीमुक्त ठेवण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची ठरणार असल्याचे सांगत नगरपरिषद प्रशासनाने सर्व नागरिक आणि व्यापाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा