नियमित प्रशासकीय प्रक्रियेचाच भाग असल्याची बतावणी...
बोले तैसा चाले… कृतीतून संदेश देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; वंदे भारत रेल्वेने प्रवास
राजकारणात मोठमोठी भाषणे करणारे अनेक नेते दिसतात, पण स्वतःच्या आचरणातून संदेश देणारे नेते फार थोडे असतात. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी ऊर्जा बचत, काटकसर आणि साधेपणाचा संदेश दिला. त्या आवाहनाला केवळ शब्दांत प्रतिसाद न देता कृतीतून उत्तर देणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज चर्चेचा विषय ठरत आहेत.
मुख्यमंत्री पद म्हणजे प्रचंड ताफा, विशेष विमान, मोठा दिमाख आणि प्रोटोकॉल अशी सर्वसामान्यांची कल्पना असते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या वागण्यातून आणि प्रवासातून वेगळा आदर्श घालून दिला आहे. पुण्याहून बेंगळुरूला इंडिगोच्या सामान्य विमानाने प्रवास, मुंबई-पुणे मार्गावर वाहनाने प्रवास आणि मुंबईहून शिर्डीला वंदे भारत एक्सप्रेसने आगमन… हे केवळ प्रवासाचे माध्यम नाही, तर जनतेला दिलेला एक सामाजिक संदेश आहे.
शिर्डी येथे आयोजित गोळा उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री आले होते. मोठ्या पदावरील व्यक्तींसाठी चार्टर्ड फ्लाईट, हेलिकॉप्टर किंवा मोठा ताफा ही सामान्य बाब मानली जाते. पण फडणवीसांनी त्यापेक्षा साधेपणाचा मार्ग निवडला. “मुक्ती नाही तर कृती” हा संदेश त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिला.
आज देश आर्थिक आव्हानांच्या काळातून जात आहे. इंधन बचत, ऊर्जा संवर्धन आणि खर्चातील शिस्त ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत आले आहेत. त्या विचाराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृतीची जोड दिली. त्यामुळे त्यांच्या प्रवासाची चर्चा ही केवळ राजकीय नसून सामाजिक भान जपणारी ठरते.
वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जिथे शक्य आहे तिथे प्रत्येकाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाचे अनुपालन केले पाहिजे. ऊर्जा बचत आणि काटकसर ही काळाची गरज आहे.”
या प्रवासादरम्यान अनेक सामान्य नागरिक, प्रवासी आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला. विशेष म्हणजे मुख्यमंत्री म्हणून शासकीय जबाबदाऱ्यांमध्ये कोणतीही तडजोड न करता त्यांनी वंदे भारत रेल्वेत बसून अनेक शासकीय फाईल्सवर सह्या केल्या आणि कामकाज सुरळीतपणे पार पाडले.
यावेळी त्यांनी वंदे भारत एक्सप्रेसचा उल्लेख “नवभारतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली अनुपम भेट” असा केला. आधुनिक भारताच्या वेगवान प्रगतीचे आणि बदलत्या कार्यसंस्कृतीचे प्रतीक म्हणून वंदे भारतकडे पाहिले पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
फडणवीस यांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा साधेपणा. कितीही मोठे पद मिळाले तरी त्यांच्यात बडेजाव नाही, अनावश्यक रुबाब नाही. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते सहजपणे मिसळतात. सामान्य माणसाशी बोलताना कोणताही दुरावा जाणवत नाही. म्हणूनच कार्यकर्ते प्रेमाने म्हणतात — “तोंडात साखर, डोक्यात बर्फ आणि पायात चक्र.”
राजकारणात विरोधक टीका करणारच. काँग्रेसकडून किंवा इतर पक्षांकडून उपहास, आरोप आणि थट्टा केली जाते. पण फडणवीस त्याकडे फारसे लक्ष न देता आपल्या कामातून उत्तर देतात. “बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले” ही संतांची शिकवण त्यांच्या वर्तनातून दिसून येते.
आजच्या काळात सामान्य जनतेला दिखाव्यापेक्षा संवेदनशीलता आणि साधेपणा अधिक भावतो. मोठा नेता सर्वसामान्यांसारखे जीवन जगताना दिसला, रेल्वेने प्रवास करताना दिसला, खर्चात काटकसर करताना दिसला की जनतेला त्याच्याशी आत्मीयता वाटते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही भूमिका म्हणूनच जनतेच्या मनाला भिडणारी ठरत आहे.
नेतृत्व हे केवळ आदेश देण्यात नसते, तर स्वतः उदाहरण निर्माण करण्यात असते. चार्टर्ड फ्लाईट बाजूला ठेवून वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास करणारा मुख्यमंत्री हा केवळ एक प्रसंग नाही; तो जनतेसमोर ठेवलेला आदर्श आहे. आजच्या राजकीय संस्कृतीत अशा कृतींचीच अधिक गरज आहे.
_________________
• राम कुलकर्णी – भाजपा प्रदेश प्रवक्ता
________________
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा