तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक...

 परळीतील जीम ट्रेनर तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

परळी वैजनाथ : प्रतिनिधी.....

    परळी वैजनाथ शहरातील इंदिरानगर परिसरात एका २३ वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (दि.२०) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. तुलसी संजय कमळु असे मयत तरुणीचे नाव आहे. मयत तरुणी ही परळी शहरातील एका जिममध्ये ट्रेनर म्हणून कार्यरत होती. परिसरात ती परिचित युवती म्हणून ओळखली जात होती. तिच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

       परळी शहरातील पद्मावती भागातील इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या या युवतीच्या घरी कोणी नव्हते. कुटुंबिय बाहेरगावी असल्याने ती घरात एकटीच होती. गुरुवारी (दि.२०) दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. या घटनेने परिसरात व परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच संभाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदना साठी परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. या प्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.अधिक तपास फौजदार चव्हाण करीत आहेत.

तरुणाईच्या वाढत्या आत्महत्या  चिंताजनक

------------------

तरुण-तरुणींमध्ये आत्महत्येच्या घटनांचे वाढते प्रमाण ही समाजासाठी चिंतेची बाब ठरत आहे. शिक्षण, करिअर, रोजगार, आर्थिक अडचणी, कौटुंबिक वाद, नातेसंबंधांतील तणाव तसेच भविष्यातील अनिश्चितता यांसारख्या विविध कारणांमुळे काही तरुण मानसिक तणावाला सामोरे जातात. मात्र, प्रत्येक घटनेमागील कारणे वेगळी असू शकतात आणि कोणत्याही घटनेचे कारण तपास पूर्ण होण्यापूर्वी निश्चित मानणे योग्य ठरत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाने तरुणांच्या भावनिक गरजा समजून घेऊन त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधणे, त्यांच्या अडचणी गांभीर्याने ऐकून घेणे आणि गरज भासल्यास तज्ज्ञांची मदत घेण्यासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे.

मरणोत्तर नेत्रदान

------------------

परळी उपजिल्हा रुग्णालयात या युवतीच्या दुःखद निधनानंतर तिच्या नातेवाईकांनी सामाजिक बांधिलकी जपत नेत्रदानाचा  निर्णय घेतला. नेत्रदान केल्यामुळे एका दृष्टीहीन व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून या संवेदनशील निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. दुःखाच्या प्रसंगीही नातेवाईकांनी दाखवलेल्या धैर्यामुळे मरणोत्तरही दुसऱ्याच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्याचे महान कार्य घडले.  हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

BREAKING NEWS: राडा ;एक ठार